पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे: उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे मदतीची मागणी केली, कारण अतिवृष्टीमुळे त्यांची शेती वाहून गेली असून, जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.
Ajit Pawar on Flood Relief यावर अजित पवार म्हणाले, “मी स्वतः परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. पाण्याचा स्तर कमी झाल्यावर नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल. नदीकाठच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना मदत देण्याबाबत सरकारने आधीच निर्णय घेतला आहे. पाणी ओसरल्यावर सर्वांना मदत पोहोचवली जाईल आणि कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.”
अजित पवार पुढे म्हणाले, “सध्या पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरग्रस्तांना दूध आणि भाजीपाला पुरवला जात आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई दिली जाईल.”
Ajit Pawar on Flood Relief यावेळी त्यांनी सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “सीना नदीवरील बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक गावांना फटका बसला आहे. मदतकार्य वेगाने सुरू आहे, मात्र वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने काही ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत. तरीही, सरकार सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.”
याशिवाय, पुरामुळे खराब झालेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे आणि काही पुलांची उंची वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने विशेष निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली असून, प्रचलित नियमांमधून शिथिलता आणून शेतकऱ्यांना अधिक मदत दिली जाईल, असेही सांगितले आहे.

 
                            